
Anant Raut Kavya Maifil Baramati
राऊत यांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक बारामतीकर मंत्रमुग्ध झाले. ‘मायबाप’, ‘शिक्षक’, ‘बाई’, ‘तो आणि ती’, ‘बा भीमा’, ‘सत्य मांड रं…’ यांसह विविध कवितांतून त्यांनी जीवनातील नाती, संघर्ष, शेतकऱ्यांची व्यथा, स्त्रीचे भावविश्व, आई-वडिलांचे ऋण आणि शिक्षकांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे, छत्रपती संभाजी महाराजांनी मरावे कसे, तर कवी कलशांनी मित्र कसा असावा, हे दाखवून दिल्याचे सांगत त्यांनी मैत्रीची व्याख्या उलगडली.
‘सत्य मांड रं…’मधून निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करताना पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्याची बाजू मांडावी, असे आवाहन केले. ‘बा भीमा’मधून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा जागर केला. जातिभेद दूर करून बंधुभाव वाढविण्याचा संदेशही त्यांनी दिला.
‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय’मधून सामाजिक-राजकीय विसंगतीवर भाष्य झाले. मैफलीने बारामतीकरांना हसवले, भावूक केले आणि अंतर्मुखही केले. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे आता हिंदी व गुजरातीमध्येही भाषांतर होणार असून या कवितेच्या आजवर दोन कोटींहून अधिक रिल्स झाल्याचेही त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते अनंत राऊत यांचा सत्कार करण्यात आला.