मुलगी संजीवनी कोमकर अन् वडील बंडू आंदेकर यांच्यातील वाद काय होता? आयुषच्या आईने सगळंच सांगितलं
पुणे : गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष क्लासवरून पार्किंगमध्ये आल्यानंतर गोळ्या झाडल्या. यामध्ये आयुषचा मृत्यू झाला, या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा टोळायुध्द सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. अशातच आता कल्याणी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना बंडू आंदेकर आणि संजीवनी कोमकर यांच्यातील वादाबाबत माहिती दिली आहे.
संजिवनीने आंदेकराकडे हिस्सा मागितला
कल्याणी कोमकर यांनी म्हटलं की, माझ्या मुलाच्या हत्या प्रकरणात सर्वांचा समावेश आहे, हे मला माहिती आहे. माझी मोठी बहिण संजिवनी कोमकर, ती पण बंडू आंदेकरांसारखी तापट आहे. ती पण तशीच रागीट आहे. संजिवनीने तिचा हिस्सा अण्णांकडे (बंडू आंदेकर) मागितला होता. तेव्हा कृष्णा आंदेकर जेलमध्ये होता. संजिवनीने हिस्सा मागितल्यावर अण्णा (बंडू आंदेकर) म्हणाले कृष्णा आल्यावर बघूया. कृष्णा बाहेर आल्यावर अण्णांनी तिला बोलवलं नाही, ती अण्णांकडे गेली नाही, असा वाद होता. तो त्यांचा विषय होता. त्यानंतर तो विषय वाढतच गेला आणि आता हे माझ्या पोरावर आलंय, त्यामुळे मला बोलावं लागतंय.
सोनाली आंदेकरला देखील अटक करा
मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा माझ्या लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना… पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकरच्याच घरी सगळे असतात. सोनाली वनराज आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला पण माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.
माझ्या मुलावर गोळीबार झाल्याचं ऐकताच मला धक्का बसला. आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी म्हणजेच बंडू आंदेकर यांनीच केले होते. लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाड केले, पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल? त्यांना काळीज नाहीये का? असा सवाल आई कल्याणीने भावनिक होत विचारला आहे.
गुन्हा सिद्ध झाला नाही तरी शिक्षा होतेय
आम्ही काहीच केले नाही. वनराज भाऊची हत्या झाल्यावर आम्हीच का दोषी? आमच्या मागे कोणीच नाही, म्हणून आमचा फायदा घेतला जातोय. गणेशने वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली होती की, मी मारले नाही. तरीही आम्ही एक वर्ष तुरुंगवास भोगतोय. आता मुलाची हत्या झाली. प्लीज, आम्हाला न्याय द्या! सीपी ऑफिसला गेलो, पण सीपी सर रजेवर असल्याचे सांगितले जाते. कोणी भेटतच नाही. सोनाली आंदेकर, कृष्णा, शिवराज, शिवम, अभिषेक हे सर्व फरार आहेत. ते आरतीच्या वेळी इथे आले होते, मुलांना घेऊन गेले. वनराजच्या हत्या झाली पण पुरावा काय? गुन्हा सिद्ध झाला नाही तरी शिक्षा होतेय. आमच्या घरात कोणी नाही, आम्ही गरीब आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आयुषच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं?
आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष कोमकरवर जवळपास 12 गोळ्या झाडल्या. त्यापैकी अमन पठाणने जवळपास 8 गोळ्या झाडल्या होत्या. आयुषची हत्या करून तेथून निघाल्यानंतर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. अर्णवने याविषयी सांगताना म्हटले की, ‘ते गाणे इकडे लागले नव्हते, ते गाणे आंदेकर चौकात लावले होते. आयुषवर हल्ला झाला तेव्हा आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर दोघीही घरात होत्या. गोळ्या झाडून तिथून निघताना दोन्ही मारेकऱ्यांनी म्हटले की, इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्यांचं असंच होणार.’