सौजन्य फोटो - सोशल मडीया
या प्रकरणाची सुरुवात विद्यापीठातील विविध कामांच्या देयकांमध्ये आढळलेल्या अनियमिततेच्या चौकशीतून झाली. विद्यापीठ प्रशासनाने यासाठी विशेष चौकशी समित्या नियुक्त केल्या होत्या. समित्यांनी देयके, कामांच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे समोर आले.
११५ बनावट देयकांचा संशय
चौकशीदरम्यान तब्बल ११५ देयके बनावट असल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. त्याच कामासाठी एकापेक्षा अधिक वेळा देयके काढण्यात आल्याचेही तपासात समोर आले. या माध्यमातून विद्यापीठाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे संबंधित कामांच्या १३८ मूळ फाईल्स आणि कागदपत्रे गहाळ असल्याचे आढळले. त्यामुळे देयकांची प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे आणि त्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या.
कुलगुरूंच्या मान्यतेनंतर पोलिसांत तक्रार
चौकशी समित्यांच्या अहवालानंतर विद्यापीठ प्रशासनाने पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. १७ जून २०२६ रोजी कुलगुरूंच्या मान्यतेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्याबाबत कुलसचिव कार्यालयाने लेखी आदेश दिले. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन २९ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे डॉ. श्यामसुंदर माने, हंसराज राठोड, सौरभ मोरे, विलास गुल्हाने, पंकज पाल, मदन लांजेवार आणि खासगी कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील पंकज पाल आणि मदन लांजेवार यांचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील प्रतिष्ठित कृषी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या कथित गैरव्यवहाराची व्याप्ती आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होणार आहे.






