Pakistan News : पाकिस्तानची नापाक हरकत! नरोवालमध्ये शतकाहून जुने मंदिर जमीनदोस्त; भारताकडून कडक कारवाईची मागणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानमध्ये (Pakistan News) अल्पसंख्याक समुदायांच्या धार्मिक प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले आणि त्यांचे होणारे नुकसान ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात असलेल्या सिराज गावातील एक ऐतिहासिक आणि सुमारे १०० वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाहोरपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक अल्पसंख्याक हिंदू समाजात प्रचंड घबराट आणि अस्वस्थता पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पाकिस्तान सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, या निंदनीय कृत्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या दुर्घटनेबद्दल अधिकृत विधान जारी करताना भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यातील सिराज गावातील शतकाहून जुने हिंदू मंदिर नष्ट करण्यात आल्याच्या चिंताजनक बातम्या भारताच्या निदर्शनास आल्या आहेत. एका ऐतिहासिक अल्पसंख्याक प्रार्थनास्थळाविरुद्ध घडवलेले हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून भारत याचा स्पष्टपणे निषेध करतो. स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि या वारसा वास्तूचे संरक्षण करण्यात आलेले त्यांचे अपयश हे अत्यंत अलार्मिंग आणि धक्कादायक आहे. अशा घटना पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाची वाढती असुरक्षितता आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे होणारे सततचे उल्लंघन अधोरेखित करतात.
Breaking: India condemns demolition of a centuary old Hindu temple in Pakistan pic.twitter.com/JI1y8191Tt — Sidhant Sibal (@sidhant) September 2, 2026
credit – social media and Twitter
या मंदिराच्या विध्वंसावरून आता दोन परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी हे शतकोत्तर जुने मंदिर अचानक जमीनदोस्त करण्यात आले. स्थानिक अल्पसंख्याक संघटना, हिंदू नागरिक आणि पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टी (PMMP) यांनी असा गंभीर आरोप केला आहे की, स्थानिक धार्मिक कट्टरतावाद्यांनी मंदिराची जागा हडप करण्यासाठी हे कृत्य केले. मंदिराची हजार चौरस मीटरची जागा शेजारील मदरशाच्या विस्तारासाठी समाविष्ट करण्याचा डाव होता आणि त्यासाठी मंदिराचे शिखर, वीटकाम तसेच धातूचे अवशेष काढून घेण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Melting glaciers : पृथ्वीवरील सर्व बर्फ वितळल्यास कायमचा बदलेल जगाचा नकाशा; भारत, बांगलादेशसह ‘हे’ खंड बुडण्याची भीती
दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानी सरकारी यंत्रणांनी आणि इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाच्या (ETPB) अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ETPB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हे मंदिर शासकीय दफ्तरात नोंदणीकृत नसले तरी ते १०० ते १२५ वर्षे जुने आणि अत्यंत जीर्ण झाले होते. अलिकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे हे जीर्ण मंदिर स्वतःहून कोसळले असून ते कोणीही पाडलेले नाही. त्यांनी स्पष्ट केले की मंदिराची जमीन कोणालाही भाडेतत्त्वावर देण्यात आलेली नाही, परंतु लगतच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
या घटनेनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याक हक्क संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टी’चे अध्यक्ष अस्लम परवेझ सहोत्रा आणि स्थानिक हिंदू नेते रतन लाल यांनी २८ ऑगस्ट रोजी पंजाब प्रांताच्या अतिरिक्त गृहसचिवांची भेट घेऊन या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हे पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात बांधून देण्यात यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
भारत सरकारने देखील पाकिस्तान सरकारला त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि नैतिक जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली आहे. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानने या प्रकरणाची त्वरित, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या समाजकंटकांना कायद्याच्या चौकटीत आणून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासोबतच, पाकिस्तानातील हिंदू, शिख आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांचे, संस्कृतीचे आणि त्यांच्या जीविताचे रक्षण करणे ही तेथील सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.






