
crime (फोटो सौजन्य: social media)
मोहोळ, (वा.) : प्रेमविवाह करून संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेचा सासरच्या छळामुळे दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे घडली आहे. ऐश्वर्या अक्षय बटाने असे मृत विवाहितेचे नाव असून, सततच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि एका नातेवाईकाविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेमविवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर शेतजमिनीच्या हक्कासंदर्भात सोडपत्र दिल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. माहेरहून सोने, कपडे व इतर वस्तू आणल्या नाहीत, तसेच शेतजमिनीच्या कागदपत्रांवर सही का केली, या कारणांवरून तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
फिर्यादीनुसार, ऐश्वर्याला उपाशी ठेवणे, मारहाण करणे आणि सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. १८ जून २०२६ रोजी ऐश्वर्या आणि तिच्या अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाला मारहाण करून घराबाहेर काढल्याचाही गंभीर आरोप नोंदविण्यात आला आहे. या सततच्या जाचाला आणि छळाला कंटाळून ऐश्वर्या तीव्र नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने अखेर टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.
मृत विवाहितेचे नातेवाईक अशोक लक्ष्मण उखळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अक्षय देविदास बटाने, सासरे देविदास जालिंदर बटाने, सासू सुवर्णा देविदास बटाने आणि बिट्टू उर्फ शिवाजी ज्ञानेश्वर भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे सय्यद वरवडे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अधिकारी सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट