
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम परिसरात पोलिसांना धारदार सुरा उगारून धमकावणाऱ्या आरोपीने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांसमोरच ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीचा जीव वाचला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद अब्दुल मुस्तफा शेख (वय ३१, रा. सेक्टर-२०, नेरुळ) याने शनिवारी (११ जुलै) दुपारी सुमारे १२.५० वाजण्याच्या सुमारास नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस राजहंस वाईन शॉपसमोरील मोकळ्या जागेत हातातील धारदार लोखंडी सुरा उगारून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावले. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र फिरवत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाडसाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने अचानक ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्याला रोखले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
यापूर्वीही संबंधित आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याने त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. पोलीस कर्मचारी विलास माणिक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पाटील पुढील तपास करीत आहेत.
कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी नेरुळ रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्थानकाजवळील वाईन शॉपबाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची नियमित गर्दी होत असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविणे, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.