Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
वाशीच्या जुहूगाव भागात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. ६५ वर्षीय नंदा रत्नाकर कदम यांचा मुलगा महेश रत्नाकर कदम याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारात नंदा कदम यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाशी पोलिसांनी महेशला ताब्यात घेत अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
नंदा कदम या वाशीतील सेक्टर ११ मधील अष्टविनायक सोसायटीमध्ये राहत होत्या. मृत महिला, मुलगा, सून आणि नातवंडांसोबत एकाच घरात राहत होत्या. घरातील काही जुन्या कारणांवरून नंदा आणि त्यांच्या सुनेमध्ये अधूनमधून खटके उडत असल्याची माहिती समोर आली आहे. आई आपल्या मुलीच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष देते, असा महेशचा समज असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
रविवारी संध्याकाळी याच मुद्द्यावरून घरात पुन्हा वाद झाला. सुरुवातीला साध्या बोलाचालीत सुरू झालेला हा वाद काही वेळातच वाढला. महेशचा राग अनावर झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने घरातील काचेच्या पॅनेलच्या मदतीने आईचा गळा आवळला. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटल्याचेही सांगण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे नंदा कदम यांचा मृत्यू झाला. Navi Mumbai Crime:
घटनेनंतर घरात मोठा गोंधळ उडाला. आईचा जीव गेल्यानंतर महेश घरातच बसून ओरडत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. घरातून मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. परिस्थिती लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच वाशी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात आली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.
महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
एका घरातील किरकोळ वाटणारा वाद एवढ्या भयंकर परिणामापर्यंत पोहोचू शकतो, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. रागाच्या क्षणी घेतलेला एक निर्णय संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आई-मुलाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हादरले आहेत.
दरम्यान, नालासोपारा परिसरातही रविवारी एक दुर्दैवी अपघात झाला. कळंब समुद्रकिनाऱ्याकडे दुचाकीवरून जात असताना पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली १९ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
इब्राहिम शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेतील बिलाल पाडा भागात राहत होता. स्नेहा गायकवाड ही तरुणी या अपघातात जखमी झाली असून ती विक्रोळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मित्राला भेटण्यासाठी ती विक्रोळीहून नालासोपारा-कळंब भागात आली होती. दोघे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
जखमी स्नेहावर वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघात कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.






