विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे राज ठाकरेंना देखील ईव्हीएम मशीनवर घेतला संशय (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूका झाल्या असल्या तरी राजकारण रंगले आहे. एकतर्फी निकालानंतर देखील महायुतीने सरकारने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत देखील संपली असून एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला आहे. 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला. पण आता या निकालावर संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम मशीनवर संशय घेतला जात आहे.
यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अटीतटीचा सामना होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल हाती आला आहे. राज्यामध्ये भाजपला तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीच्या या अफाट यशामुळे विरोधी पक्षनेता पदावर दावा देखील करण्यात महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे मविआने ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता निवडणुकीमध्ये एकही जागा न मिळवलेल्या मनसे पक्षाने देखील ईव्हीएम घोटाळ्याची रीघ ओढली आहे
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. अविनाश जाधव म्हणाले की, “एवढा मोठा विजय मिळवून देखील भाजप आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र एकत्र आला तरी होणार काही नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे. अमेरिका सारख्या देशात जर बॅलेट वर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजेत. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांची मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता सगळेच यांचे निवडून आले असते तर लोकांनी यांना चपलेने मारलं असतं,” असा घणाघात मनसे नेते अविनाश जाधव यांनी लगावला आहे.
पुढे अविनाश जाधव म्हणाले की, “मागच्या काही दिवसापासून जे व्हीडिओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. राज ठाकरे लवकरच ईव्हीएमबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यावेळी राज्याला कळेल नक्की काय झालं आहे,” असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे मनसे नेते जाधव म्हणाले की, “यंदाच्या निवडणुकीमध्ये एक पिक्चर तयार करण्यात आला. त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटिंग हे बसवलं गेलं. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होते ही दिसत नव्हती या उलट भारतीय जनता पक्षाबद्दलचा राग दिसला. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आमची कोणतीही अपेक्षा नाही. मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही. लोक सभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र त्याची परतफेड आता महायुतीने कशी केली आहे हे तुम्हीच बघताय,” असे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.