
फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत असले, तरी दिलजीतने या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “मी कलाकार आहे, नेता नाही,” असे स्पष्ट सांगत त्याने कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला.
अलीकडेच दिलजीत इंस्टाग्रामवर लाइव्ह आला असताना एका चाहत्याने त्याला जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यावर पंजाबी भाषेत उत्तर देताना तो म्हणाला, “जंतर-मंतरवर नेमकं कोणतं आंदोलन सुरू आहे, हेच मला माहीत नाही. कृपया मला अशा आंदोलनांपासून दूर ठेवा. मी एक कलाकार आहे, नेता नाही. या जगात कधीच काही चांगलं होणार नाही. जे आंदोलन करत आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांच्यासाठी आंदोलन सुरू आहे त्यांनाही शुभेच्छा. मला या विषयाची कोणतीही माहिती नाही.”
दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी समर्थन दिले असून अभिनेता प्रकाश राज यांनीही प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, दिलजीतने या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही भूमिका न घेण्याचे पसंत केले.
यापूर्वीही दिलजीत दोसांझ एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आला होता. त्याच्या एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान काही जण खलिस्तान समर्थक झेंडे घेऊन स्टेजवर पोहोचले होते. या प्रकारानंतर त्याने काही वेळ कार्यक्रम थांबवला होता. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मात्र त्याने पुन्हा आपला परफॉर्मन्स सुरू केला.
दरम्यान, दिलजीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित होऊन 20 दिवस उलटूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या या चित्रपटाने सकारात्मक ‘वर्ड ऑफ माउथ’च्या जोरावर 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सुरुवातीला अपेक्षेइतकी मोठी ओपनिंग न मिळाल्यानंतरही चित्रपटाने केलेली ही कमाई विशेष उल्लेखनीय मानली जात आहे.