
फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीत देशभरातील लाखो कॉक्रोच जमले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या रस्त्यांवर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारले आहे. या दरम्यान, जमलेल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठी-काठींचा हल्ला केल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण देशभरातून दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. मराठी मनोरंजनसृष्टीतूनही अनेक कलावंतांनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांचे मत मांडले. त्यातील बहुतांश कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, सुप्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले याने या संपूर्ण प्रकरणावर वेगळे मत दिल्याचे समोर आले आहे.
एका मुलाखतीत बोलताना कोणतीही घटना घडली की त्यासाठी केवळ सरकारलाच जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. पेपरफुटी प्रकरणातील संबंधित आरोपींवर कारवाई झाली असून प्रशासनाने आवश्यक पावले उचलल्याचेही त्याने नमूद केले. मुलाखतीत सांगताना सौरभ आधी या आंदोलनाची सकारात्मक बाजू समजावून सांगतो. तो म्हणतो की, “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, ही मागणी निश्चितच योग्य आहे. आंदोलनामागील उद्देश समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडले पाहिजेत.”
परंतु सौरभने या आंदोलनात घडलेल्या आणि त्याला न पटणाऱ्या बाजूंवरही भाष्य केले आहे. आंदोलनादरम्यान काही घोषणांमुळे आणि धार्मिक मुद्दे समोर आल्याने मूळ विषय भरकटल्याची भावना त्याने व्यक्त केली. हिंदू धर्म आणि प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा दावा करत, अशा प्रकारच्या गोष्टींना आपण कधीही पाठिंबा देणार नसल्याचे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले.
त्याच्या म्हणण्यानुसार, शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन करणे योग्य असले तरी त्यामध्ये इतर वादग्रस्त विषय मिसळले गेले, तर आंदोलनाचा मूळ हेतू कमकुवत होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घडामोडींमुळे त्या आंदोलनाशी जोडले जाणे किंवा त्याला पाठिंबा देण्याची इच्छा कमी होते, असेही त्याने स्पष्ट केले.
आधी ‘अल्याड पल्याड’ मग ‘घबाडकुंड’; विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा!
सौरभ गोखलेच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याच्या मताचे समर्थन केले असून, तर काहींनी त्याच्याशी असहमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सौरभच्या या मतामुळे त्याच्या चाहत्यांनी विविध मतांचा वर्षाव केला आहे. बहुतांश चाहत्यांनी असहमती दाखवली असून काही चाहत्यांनी त्याच्या विचारांची प्रशंसा केली आहे. परंतु, सौरभसहित अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा धरून ठेवला आहे आणि आपले मत मांडले आहे.