
फोटो सौजन्य - Social Media
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचला असून, घरातील प्रत्येक टास्क चुरशीचा ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कमध्ये टोपल्यांच्या संख्येवरून झालेल्या वादामुळे घरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या टास्कदरम्यान करण आणि रुचिता यांच्यातील वाद इतका वाढला की, संपूर्ण घराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
टास्कदरम्यान टोपल्या योग्य ठिकाणी नेण्यावरून आणि रणनीतीच्या वापरावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. रुचिताचा आरोप होता की, करणने मुद्दामहून टास्क बिघडवण्यासाठी अडथळे आणले आणि सुरू असलेली प्रक्रिया ‘उद्ध्वस्त’ केली. तिच्या मते, करणने सुरुवातीलाच चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे संपूर्ण टास्कचा तोल ढासळला. यावरूनच दोघांमध्ये जोरदार वादाला तोंड फुटले.
संवादादरम्यान रुचिताने थेट सवाल करत विचारले, “तुम्ही सुरुवातच का केली?” यावर प्राजक्तानेही हस्तक्षेप करत, “नंतर घ्यायच्या ना? ते उद्ध्वस्त का केलं?” असा प्रश्न उपस्थित केला. रुचिताने पुढे स्पष्ट केले की, तिने कोणत्याही गोष्टीला हात लावला नव्हता, तर फक्त टोपली हलवत होती. तिच्या म्हणण्यानुसार, आधी करणकडूनच चारही टोपल्या एकत्र ठेवण्यात आल्या आणि त्यामुळे परिस्थिती चिघळली.
या आरोपांना उत्तर देताना करणने मात्र आपली बाजू ठामपणे मांडली. “डोकं लावायचं होतं,” असे म्हणत त्याने हे सर्व रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट केले. करणच्या मते, बिग बॉसच्या घरात केवळ शारीरिक शक्ती नव्हे तर बुद्धी आणि युक्तीचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, रुचिताने यावर आक्षेप घेत स्पष्ट शब्दांत सांगितले, “तुम्ही युक्तीचा वापर केला, म्हणून मग मी शक्तीचा वापर केला! संपला विषय.” या विधानामुळे वाद आणखी पेटला. या संपूर्ण घटनेदरम्यान इतर स्पर्धकही संभ्रमात दिसत होते. काहींनी करणची रणनीती योग्य असल्याचे मान्य केले, तर काहींनी रुचिताच्या भावनिक प्रतिक्रिया समजून घेतल्या. टास्कदरम्यान वाढलेला तणाव, आवाज चढवलेले संवाद आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदलले होते.
या वादामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला आणखी रंगत आली असून, प्रेक्षकांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर करण आणि रुचिताच्या भूमिकांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.