
फोटो सौजन्य - Social Media
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या Deool Band या सुपरहिट चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम मांडत मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आता तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या Deool Band 2 – Aata Pariksha Devachi या बहुचर्चित सिक्वेलने प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली असून प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत आहे.
विशेष म्हणजे, चित्रपट पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी पहाटे सहा वाजता गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत प्रदर्शित करण्यात आला. या अनोख्या प्रयोगालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून पहाटेच्या शोसाठीही थिएटरबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईतील भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ या मराठीबहुल भागांतही चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. अनेक थिएटरमधील सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवर तिकिटांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही चित्रपटातील दमदार संवाद, भावनिक प्रसंग, कथानक, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन Pravin Vitthal Tarde यांनी केले असून त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते Mohan Joshi यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत प्रभावी अभिनय साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
Vatvruksh Entertainment निर्मित या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, भव्य सादरीकरण आणि प्रभावी पार्श्वसंगीतामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरत आहे.
पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ५०० चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित करण्यात आले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाल्याने हा प्रतिसाद मराठी चित्रपटसृष्टीसाठी विक्रमी मानला जात आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीप्रमाणे वेगळ्या दिवशी आणि शुभ मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याची चर्चा आता चित्रपट वर्तुळात रंगू लागली आहे.