
फोटो सौजन्य - Social Media
समर्थ रामदास स्वामींचे विचार, तत्त्वज्ञान, राष्ट्रधर्म आणि समाजप्रबोधनाची शिकवण नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारत असलेला ‘समर्थ’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या ऑगस्ट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून, चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक मासानिमित्त आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामकथा मानस पसायदान’ या विशेष प्रवचन कार्यक्रमात चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे भव्य अनावरण करण्यात आले. अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रथमच रसिकांसमोर आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
या चित्रपटाची मूळ संकल्पना उद्योगपती आणि प्रसिद्ध रामकथा प्रवचनकार रवींद्र पाठक यांची आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी चित्रपटामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी हे केवळ संत नव्हते, तर ते समाजसुधारक, राष्ट्रप्रेमी आणि लोकजागृती करणारे महान विचारवंत होते. त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव आजही समाजावर दिसून येतो. ‘समर्थ’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची ताकद आणि त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून, प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आणि प्रेरणा देणारा ठरेल.”
चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. निर्मात्यांनी कलाकारांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचे सांगितले असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या शिकवणुकीत आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी कथनशैलीच्या माध्यमातून हे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
‘समर्थ’ चित्रपटाची निर्मिती आणि कथा रवींद्र पाठक यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचा कथाविस्तार आणि पटकथा आशुतोष भोसेकर यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी मानस लयाळ यांनी पार पाडली आहे. तर अमोल भगत हे चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि कार्यकारी निर्माते म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू टीमच्या माध्यमातून हा चित्रपट साकारला जात असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेरणादायी विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. त्यातच समर्थ रामदास स्वामींसारख्या महान संताच्या जीवनदृष्टीवर आणि विचारांवर आधारित चित्रपट असल्याने ‘समर्थ’कडे विशेष लक्ष वेधले जात आहे. समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारे विषय आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘समर्थ’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचे कार्यही करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक माध्यमातून वेध घेणारा आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘समर्थ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव ठरणार आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आता रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.