
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मराठी टेलिव्हिजन विश्वात नवनवीन प्रयोगांसाठी ओळखली जाणारी झी मराठी पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांची आवड जपणाऱ्या या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये प्रथमच संपूर्ण ‘नो-डायलॉग’ (मौन) एपिसोड सादर करण्यात येणार आहे.
एकही संवाद नसलेला हा विशेष भाग केवळ अभिनय, हावभाव, देहबोली, पार्श्वसंगीत आणि भावनांच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. संवादांशिवाय संपूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.
या विशेष भागात आधिरा घरातून रुसून समरच्या घरी येते. तिचा आणि रोहनचा अबोला वाढत जातो. समर आणि स्वानंदी तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, स्वानंदीही काही काळ कोणाशीही न बोलण्याचा निर्णय घेते. रोहन आधिराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतानाच घरात एका चोराची एंट्री होते आणि कथेला वेगळे वळण मिळते.
या अनोख्या प्रयोगाबद्दल अभिनेता सुबोध भावे (समर) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (स्वानंदी) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, हा भाग केवळ वेगळं काही करण्यासाठी केलेला प्रयोग नसून, कथेच्या गरजेतून साकारला गेला आहे.
सुबोध भावे म्हणाले, “हा पूर्णपणे मौन भाग आहे. या भागात कोणीही कोणाशी बोलत नाही. एकही संवाद न वापरता संपूर्ण भाग सादर करणं हे मोठं धाडस आहे. संवादांशिवाय केवळ देहबोली, नजरा आणि हावभावातून भावना व्यक्त करणं हे खूप आव्हानात्मक आहे.”
ते पुढे म्हणाले, “कधी कधी शांत राहणंही गरजेचं असतं. सतत बोलत राहिलं की शब्दांची किंमत कमी होते. काही काळ शांतता अनुभवली की पुन्हा एकमेकांशी बोलावंसं वाटतं आणि ते बोलणं अधिक मनापासून होतं.”
या ‘नो-डायलॉग’ एपिसोडमधून कलाकारांच्या अभिनयाची खरी कसोटी लागणार असून, मराठी मालिकांच्या इतिहासातील हा प्रयोग प्रेक्षकांसाठीही वेगळा अनुभव ठरणार आहे.