( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Mary Kom Statement : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या बॉक्सर मैरी कॉम सध्या ‘बिग बॉस 20’मधील सहभागामुळे चर्चेत आहेत. शोमध्ये काजी तौकीरसह झालेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं. मात्र, यावेळी केलेल्या एका कमेंटमुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसल्या.
क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या भारतीय महिला खेळाडूंबद्दल चर्चा सुरू होती. यावेळी काजी तौकीरने टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. काजी म्हणाला, “आपल्याकडे किती मुलींनी खेळामध्ये कमाल केली आहे. सानिया मिर्झानेही खूप चांगली कामगिरी केली, सायना नेहवाल…”
काजी सानिया आणि सायना यांचं नाव घेत असतानाच मैरी कॉम यांनी त्यांना मध्येच थांबवत म्हटलं, “पण माझ्यासारखं कुणी काही मिळवलं नाही.” यानंतर त्यांनी आपण सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं सांगितलं.
मैरी कॉम आपल्या विक्रमाबद्दल बोलत असताना काही प्रेक्षकांना मात्र त्यांची टिप्पणी इतर खेळाडूंना कमी लेखणारी वाटली. एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
काही युजर्सनी मैरी कॉम यांच्यावर इतर महिला खेळाडूंच्या कामगिरीचा अनादर केल्याचा आरोप केला.
काहींनी त्यांचा अंदाज ‘अहंकारी’ असल्याचं म्हटलं.
एका युजरने काजी महिला खेळाडूंचं कौतुक करत असताना त्यांना मध्येच थांबवण्याची गरज काय होती, असा सवाल केला.
काही नेटकऱ्यांनी मैरी कॉम यांच्या वक्तव्याला ‘सॉल्टी’ म्हणजेच नाराज किंवा चिडलेलं असल्याचं म्हटलं.वाद वाढल्यानंतर मैरी कॉमच्या टीमकडून स्पष्टीकरण
सोशल मीडियावर टीका वाढल्यानंतर मैरी कॉम यांच्या अधिकृत अकाउंटवरून त्यांच्या टीमने स्पष्टीकरण देत माफी मागितली. मैरी कॉम यांच्या वक्तव्याचा उद्देश कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीला कमी लेखणे किंवा त्यांच्याशी स्वतःची तुलना करणे हा नव्हता, असं टीमने स्पष्ट केलं.
टीमने म्हटलं की, “जर मैरी यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला गेला असेल, तर आम्ही माफी मागतो. कोणत्याही खेळाडूच्या प्रवासाला कमी लेखण्याचा किंवा त्यांची तुलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता.”
मैरी कॉम भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि खेळासाठी सर्वस्व देणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आदर करतात, असंही टीमने स्पष्ट केलं.
टीमने पुढे सर्व खेळांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आदर असल्याचं सांगितलं. “प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येक कामगिरी महत्त्वाची असते आणि प्रत्येक पदक भारताचा मान वाढवतं,” असं टीमकडून सांगण्यात आलं.
यावर्षी मैरी कॉम यांच्याभोवती निर्माण झालेला हा पहिला वाद नाही. फेब्रुवारीमध्ये माजी पतीसोबतच्या घटस्फोटाबाबत केलेल्या काही वक्तव्यांमुळेही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं सांगत नंतर माफी मागितली होती. त्यांनी व्हिडीओ शेअर करत कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
आता ‘बिग बॉस 20’मधील सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांच्यावरील कमेंटमुळे मैरी कॉम पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या टीमने स्पष्टीकरण देत माफी मागितल्यानंतर हा वाद किती शांत होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






