
फोटो सौजन्य - Social Media
मुंबईच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचा जल्लोष घेऊन येत आहेत ज्येष्ठ अभिनेते Vinay Yedekar. ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या प्रयोगामागे मैत्रीचा जिव्हाळ्याचा धागा गुंफलेला आहे. Royal Theatre निर्मित आणि मिहिर गवळी यांच्या पुढाकारातून हे नाटक रंगमंचावर साकारत आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना विनय येडेकर भावूक होत Atul Parchure यांच्या आठवणींना उजाळा देतात. ते सांगतात, “ही भूमिका अतुलने ज्या ताकदीने साकारली, त्याच मंचावर त्याची आठवण जपत काम करणे, ही माझ्यासाठी श्रद्धांजली आहे.” तालमीदरम्यान एखाद्या प्रसंगात अडथळा आला की, “अतुल असता तर हा सीन कसा रंगवला असता?” असा विचार ते करतात. या भावनेतूनच ते भूमिका साकारत असून, मैत्रीचा वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.
नाटकाचे दिग्दर्शन Santosh Pawar यांनी केले आहे. त्यांचे आणि विनय येडेकर यांचे जुने ट्यूनिंग या नाटकातील विनोद अधिक परिणामकारक बनवणार आहे. सोबत Ananda Karekar, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर यांचा दमदार नटसंच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तांत्रिक बाजू संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाशयोजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी सक्षमपणे सांभाळली आहे.
या नाटकाचे शुभारंभ प्रयोग १ मे रोजी Yashwant Natya Mandir येथे आणि २ मे रोजी Meenatai Thackeray Natyagruha येथे होणार आहेत. दोन्ही प्रयोगांबाबत रंगभूमीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ हे नाटक केवळ विनोदाची मेजवानी देणारे नाही, तर मैत्रीची नाती आणि भावनिक आठवणी जपणारा अनुभवही देणारे आहे. प्रेक्षकांना हसवतानाच अंतर्मुख करणारे हे नाटक रसिकांच्या मनावर ठसा उमटवेल, यात शंका नाही. त्यामुळे या नाटकासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.