
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जेव्हा लोक २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांबद्दल ऐकतात, तेव्हा त्यांना ताज हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन आणि दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या इतर ठिकाणची गोंधळाची परिस्थिती लगेच आठवते. या घटनेशी संबंधित अनेक कथा लोकांना मोठ्या प्रमाणावर अज्ञात आहेत आणि त्यावर क्वचितच चर्चा होते. अशीच एक कथा आहे नर्स अंजली कुलथे यांची. २६ नोव्हेंबर २००८ च्या त्या दुर्दैवी रात्री, जेव्हा दहशतवादी मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये घुसले, तेव्हा नर्स अंजलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तेथे उपस्थित असलेल्या सर्वात असहाय्य लोकांचे रक्षण केले. आता, या खऱ्या आयुष्यातील नायिकेची कथा कंगना रणौतच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
कंगना रणौत नेहमीच तिच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांमुळे चर्चेत असते, कारण तिला अशा कथा पडद्यावर साकारायला आवडतात. आता, १६ वर्षांनंतर, अभिनेत्री कंगना रणौत ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यातील नायिका अंजली कुलथे यांची अद्भुत कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत एका धाडसी नर्सची भूमिका साकारताना दिसणार आहे.
अंजली कुलथे कामा हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना बातमी मिळाली की, सीएसटीवर हल्ला करणारे दहशतवादी हॉस्पिटलमध्ये घुसणार आहेत. त्या दिवशी, त्यांनी २० गर्भवती महिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या सुरक्षेची पर्वा केली नाही.
एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत अंजली कुलथे यांनी 26/11 च्या त्या भीषण रात्रीची आठवण सांगितली होती. त्या म्हणाल्या, “रात्री साडेनऊच्या सुमारास दहशतवादी कामा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही मिनिटांतच गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. रुग्णालयाच्या मागील बाजूने सतत गोळीबार सुरू होता. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर दोन दहशतवादी पळताना दिसले, तर पोलीस त्यांच्यावर गोळीबार करत होते. मात्र, रुग्णालयाच्या आवाराभोवती असलेले कमी उंचीचे गेट ओलांडून ते सहज आत शिरले,” असे त्यांनी सांगितले होते.
दहशतवादी हल्ला सुरू असल्याचे समजताच अंजली कुलथे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यांनी प्रसूती विभागातील 20 गर्भवती महिलांना एकत्र केले आणि त्यांना एका छोट्या पॅन्ट्रीमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवले. कोणत्याही प्रकारचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून सर्व दिवे आणि मोबाईल फोन बंद करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद करून 10 बाय 10 फूटांच्या खोलीत सर्व महिलांना सुरक्षित ठेवले.
या तणावपूर्ण परिस्थितीतही अंजली कुलथे यांचे धैर्य कमी झाले नाही. त्यांनी सांगितले की, त्या महिलांपैकी एका उच्च रक्तदाब असलेल्या गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यावेळी रुग्णालयात गोळीबार सुरू असल्यामुळे डॉक्टरांनी वॉर्डमध्ये येण्यास नकार दिला होता. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता अंजली कुलथे यांनी त्या महिलेला जिन्यावरून एकेक पायरी चढवत प्रसूती कक्षात नेले.
अखेर पहाटे त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाहेर गोळीबार सुरू असताना आणि मृत्यूचे सावट डोक्यावर असताना अंजली कुलथे यांनी दाखवलेले धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 26/11 च्या त्या काळरात्रीत त्यांनी केवळ 20 गर्भवती महिलांचेच नव्हे, तर त्यांच्या गर्भातील बाळांचेही प्राण वाचवले होते. त्यामुळेच त्यांना 26/11 ची खरी नायिका म्हटले जाते.
‘भारत भाग्य विधाता’ कधी प्रदर्शित होणार?
‘भारत भाग्य विधाता’ १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या कथानकामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून लोक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.