देशभरात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी शाहिद झालेल्या अश्याच एका भारतीय सैनिकाचे पार्थिव मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी तब्बल ३८ वर्षानंतर त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहे.
१९ कुमाऊँ रेजिमेंटचे लान्स नाईक शाहिद चंद्रशेखर हरबोला हे 38 वर्षांपूर्वी सियाचीनमध्ये गस्तीवर असताना हिमस्खलनामध्ये बळी पडले होते. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील द्वारहाट येथील हाथीगुर बिंता येथे राहणारे चंद्रशेखर त्यावेळी २८ वर्षांचे होते. १९७५ मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. १९८४ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचीनसाठी संघर्ष झाला होता. भारताने या मोहिमेला ऑपरेशन मेघदूत असे नाव दिले होते. या ऑपरेशनमध्ये २० सदस्यीय गस्ती पथक हिमस्खलनामुळे बेपत्ता झाले होते. नंतर यातील १५ जणांचे मृतदेह सापडले, मात्र ५ जणांचा शोध लागलाच नव्हता. ज्या 5 बेपत्ता जवानांचे मृतदेह बर्फात गाडले गेले त्यात चंद्रशेखर यांचाही समावेश होता.
अलीकडेच सियाचीन ग्लेशियरचा बर्फ वितळू लागल्यावर पुन्हा एकदा हरवलेल्या सैनिकांचा शोध सुरू करण्यात आला. या प्रयत्नादरम्यान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला आणिआणखी एका सैनिकाचा मृतदेह हिमनदीवर बांधलेल्या जुन्या बंकरमध्ये सापडला. हरबोला यांचा मृतदेह भारतीय लष्कराकडून त्यांना देण्यात आलेल्या डिस्क नंबरवरून ओळखले गेले. हरबोला यांच्या डिस्कवर ( ४१६४५८४) हा क्रमांक लिहिला होता.
Remains of Lance Naik Chandrashekhar Harbola, 19 KUMAON REGT were found after 38 years at World’s highest battlefield, Siachen.
His.
A resident of Hathigur Binta of Dwarahat in Almora, Uttarakhand,
His 65 year old wife and two daughters will receive him on Tuesday one last time. pic.twitter.com/axz10ZdsP9— Guardians_of_the_Nation (@love_for_nation) August 15, 2022
३८ वर्षांपूर्वी जेव्हा सियाचीनमध्ये ही घटना घडली तेव्हा हरबोला यांची मोठी मुलगी ८ वर्षांची आणि धाकटी मुलगी सुमारे ४ वर्षांची होती. मंगळवारी शाहिद चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव त्यांची ६५ वर्षीय पत्नी आणि दोन मुली स्वीकारणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम श्रद्धांजली देण्यात येणार आहे.