
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताने (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेतील पीडितांना केवळ सरकारच मदत करत नाही, तर घटनास्थळाच्या आसपासचे लोकही पुढे आले आहेत. एनडीआरएफ, लष्कर, पोलीस, डॉक्टरांपासून ते सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण बचाव कार्यापासून ते रुग्णालयांपर्यंत मदत करत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये मानवतेचे एक उत्तम उदाहरण सध्या समोर आलं आहे. ओडिशातील तरुण रेल्वे अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी संसाधनांपासून ते रक्तापर्यंत सर्व काही देण्यास तयार आहेत. बालासोर रुग्णालयात रक्तदानासाठी गर्दी होत आहे.
[read_also content=”रेल्वेरुळ झाले वेगळे, चाकं निघाली; गॅस कटरने बोगी कापून बाहेर काढले जात आहेत मृतदेह https://www.navarashtra.com/india/odisha-train-accident-death-toll-rises-to-233-900-people-are-serious-railway-minister-ashwini-vaishnav-presented-nrps-409143.html”]
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील रुग्णालयांमधून समोर आलेल्या चित्रांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, शेकडो स्थानिक तरुण रेल्वे अपघातातील जखमींना रक्त देण्यासाठी रांगेत उभे आहेत. स्वत:च्या वाहनाने येवून ते कडक उन्हातही रक्तदान करण्यासाठी थांबले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, ‘एम्स भुवनेश्वरमधून डॉक्टरांच्या दोन टीम बालासोर आणि कटकला अपघातस्थळी पाठवण्यात आल्या आहेत. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक मदत आणि वैद्यकीय मदत देत आहोत. सोरो मेडिकल युनिटमधील जखमी प्रवाशांना रेल्वेकडून ५०,००० रुपयांची सानुग्रह रक्कम सुपूर्द करण्यात आली.
तर, मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय हवाई दलाने दोन Mi-17 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. जमिनीच्या पातळीवर रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने बचावकार्य सुरू आहे. याशिवाय अनेक जादा बसेस आणि ट्रेनच्या डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले जात आहे.
जखमी नागरिकांना वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहे. पूर्व कमांडकडून रुग्णवाहिका आणि सहाय्यक सेवांसह लष्कराची वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचावे यासाठी अनेक ठिकाणांहून पथके पाठवण्यात आली आहेत.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही रेल्वे अपघातानंतर प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत. या रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. त्याचवेळी अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान हे दोन केंद्रीय मंत्री घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले की, ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2-2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.