
पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा
मंचर : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आयोजित रास्ता रोको आंदोलनात वळसे पाटील बोलत होते.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, सदस्य संजय पवळे, निलेश टेमकर, शिवाजीराव निघोट, उषा कानडे, शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन भोर, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष नवनाथ हुले, सतीश रोडे पाटील, अजय घुले, संतोष धुमाळ, प्रा. दत्तात्रय भालेराव, रमेश कानडे, सुषमा शिंदे, अल्लूभाई इनामदार, सरपंच प्रसाद कराळे, दिनेश खेडकर आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू
आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा मार्ग केवळ प्रवाशांसाठी नव्हे, तर शेतकरी, विद्यार्थी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक रमेश खिलारी, आभार सुहास बाणखेले यांनी मानले.
सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात चाकणमध्ये सर्वपक्षीय आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पुन्हा सुरू करावा आणि रेल्वेचा मूळ, पारंपरिक व सरळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी चाकण येथे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले. पुणे-नाशिक दरम्यानचा प्रस्तावित रेल्वे मार्ग चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गानेच नेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने प्रकल्पात कोणताही बदल करण्याऐवजी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्याची मागणी करण्यात आली.