
Assembly Elections 2026, Assam Elections, Kerala Polls, Puducherry Election,
Puducherry Election : आसाम, केरळ आणि पुदुचेरी या तीन राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. एकूण २९६ जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत, आसाममध्ये ५९.६३%, केरळमध्ये ४९,७०% आणि पुदुचेरीमध्ये ५६.८३% मतदान झाले होते. पुदुचेरीमध्ये, मन्नाडीपेट येथील एका मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी गुवाहाटी येथील माँ कामाख्या मंदिराला भेट दिली. यानंतर ते दुपारी आपल्या पत्नीसह जलुकवारी येथे पोहोचले आणि त्यांनी मतदान केले. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील बारपेटा येथे मतदानात व्यत्यय आला.
दरम्यान, पुदुचेरीचे मुख्यमंत्री रंगस्वामी यांनी मोटारसायकलवरून मतदान केंद्रावर जाऊन आपले मत दिले, पुदुचेरीमधील एका मतदान केंद्रावर रोबोट्सनी फुलांनी मतदारांचे स्वागत केले.
आसाममधील दोन ठिकाणी झालेल्या निवडणूक हिंसाचार प्रकरणी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सात जणांना ताब्यात घेतले. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर किरकोळ चकमकी झाल्या, ज्यात लोक किरकोळ जखमी झाले. पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था), अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७वाजता मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी, बुधवारी रात्री तामुलपूर आणि शिवसागरमध्ये हिंसाचार उसळला.
काल रात्री तामुलपूरमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती आम्हाला मिळाली, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, जमावाने आज्ञा न मानल्याने त्यांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. घटनास्थळावरून चार जणांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका घटनेत शिवसागरमध्ये एका राजकीय पक्षाच्या दोन ते तीन सदस्यांवर हल्ला करण्यात आला, आम्ही तेथून तीन जांना ताब्यात घेतले आहे. शिवसागर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू पाहणाऱ्या अखिल गोगोई यांनी आरोप केला.
आहे की, या घटनेमागे भाजप उमेदवार कुशल डोवारी यांचा हात होता. सोशल मीडियावर केलेल्या अनेक पोस्टमध्ये गोगोई यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आणि त्यांच्या वाहनांचे नुकसान झाले. बोडोलैंड टेरिटोरियल कौन्सिलचे (बीटीसी) मुख्य कार्यकारी सदस्य हाम्रामा मोहिलारी म्हणाले की, तामुलपूरमधील संघर्षाचे कारण सविस्तर तपासात उघड होईल. आता परिस्थिती सामान्य आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी तिरुवनंतपुरममध्ये मतदान केले. ते नेमोम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी कन्नूरमधील आरसी अमला बेसिक अप्पर प्रायमरी स्कूलमध्ये मतदान केले. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार सुरेश गोपी यांनी ब्रिसूरमध्ये मतदान केले. केरळमध्ये, माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी तिरुवनंतपुरम येथे आपले मतदान केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केरळच्या जनतेला भाजप आवडत नाही. राज्यात १० वर्षे गैरकारभार चालला आहे. त्यामुळे, यावेळी सरकार बदलेल.