
हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये २९० रस्ते बंद
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उघडीप दिलेला पाऊस आता सातत्याने पडत आहे. या मुसळधार पावसामुळे पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात घडामोडी दिसून येत आहेत. भूस्खलन आणि पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये जवळपास २९० रस्ते बंद आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथे झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडेही उन्मळून पडली.
२८-२९ जुलैच्या मध्यरात्रीसाठी जारी केलेल्या अंदाजात, हवामान विभागाने म्हटले आहे की, उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागावर आणि दक्षिण झारखंड व छत्तीसगडच्या लगतच्या भागांवर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत १८ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. पुढील २४ तासांत ते उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागातून आणि उत्तर छत्तीसगडमधून पश्चिमेकडेच सरकत राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, वायव्य भारतातील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे २० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ११:३० वाजता, उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि छत्तीसगडच्या आसपासच्या भागांवर एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होते. झारसुगुडा (ओडिशा) पासून सुमारे ३० किमी पूर्वेला, राउरकेला (ओडिशा) पासून ६० किमी नैऋत्येला, संबलपूर (ओडिशा) पासून ७० किमी ईशान्येला, रायगड (छत्तीसगड) पासून ११० किमी पूर्वेला आणि केओनझारगड (ओडिशा) पासून १२० किमी पश्चिम-वायव्येला केंद्रित असलेल्या या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या तीन राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे उष्णताही कमी झाली आणि मंगळवारी झारखंडमध्ये तापमान २०-२५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तीन ओढ्यांना अचानक पूर
हिमाचल प्रदेशातील चंबा आणि आसपासच्या परिसरातील तीन ओढ्यांना आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे विध्वंस झाला आहे. चंबामध्ये एक कार घसरून दरीत कोसळल्याने, तीन महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, घरात ढिगारा शिरल्याने ६४ घरे आणि आठ दुकानांचे नुकसान झाले आहे. २२ हून अधिक वाहने गाडली गेली आहेत.
अनेक रस्ते बंद; वाहतुकीवर मोठा परिणाम
राज्यभरातील १७९ रस्ते बंद आहेत. ६२ वीज ट्रान्सफॉर्मर आणि १०७ पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावित झाल्या आहेत. उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे तीन राष्ट्रीय महामार्ग आणि सहा राज्य महामार्गांसह १११ रस्ते बंद आहेत.