
Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील घाटमाथ्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस हवामानात बदल कायम राहण्याची शक्यता असून, पावसाच्या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. कोकण विभागात सध्या काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडताना पाहायला मिळत आहेत. 11 सप्टेंबर रोजी या भागासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे आणि उष्ण स्वरूपाचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर या भागांत सध्या कोणताही अलर्ट नाही. मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाचा इशारा सध्या देण्यात आलेला नाही. शनिवारपासून या भागातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे.
नांदेड, हिंगोलीलाही यलो अलर्ट
लातूर, जालना, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे.