
नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना मलेशियाने तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना तडा गेला आहे. परिणामी, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा खुश ठेवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
गेल्या दहा दिवसांत सोयाबीन, सनफ्लॉवर आणि शेंगदाणे तेलाच्या दरात प्रति किलो पाच रुपयांची वाढ झालेली आहे. आता होळी, रमझान आणि त्यानंतर लग्नसराई असल्याने भाव कमी होण्याची शक्यता मावळली आहे. खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलल्याने काही काळ ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र, मलेशिया सरकारने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला. त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे.
केंद्र सरकारने दोनदा आयात शुल्कात कपात केली होती. ती कपात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील. सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार नाही, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. मलेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर अधिक शुल्क आकारण्याच्या निर्णय घेतल्याने खाद्यतेल महाग होणे सुरू झाले आहे.
पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीन, सनफ्लॉवर आणि शेंगदाणे तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. भारताला गरजेच्या तब्बल 65 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. आयातीतही पामतेलाचा वाटा तब्बल 70 टक्के आहे. इंडोनेशियामध्ये पामतेल बायोडिझेलसाठी वापरले जाते.