सोनप्रयाग ते केदारनाथ ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत! काय होणार बदल, कोणत्या भाविकांना होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिर देश विदेशातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ बद्रिनाथला भेट देत असतात. मात्र दऱ्याखोऱ्यांचा १६ किलोमीटरचा अतिशय खडतर मार्ग पार करून भाविकांना इथपर्यंत पोहोचावं लागतं. कोणतंही वाहन नाही, तब्बल ९ तास पायपीट किंवा खेचराच्या, माणसांच्या पाठीवरून सवारी करावी लागते. मात्र करोडो भाविकाचा हा खडतर प्रवास सोपा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 9 तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटात करता येईल, असा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. ४,०८१ कोटी निधीतून १२.९ किमी लांबीचा रोप वे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे केदारनाथमध्ये काय बदल होणार. कोणत्या भाविकांना याचा फायदा होणार, जाणून घेऊया…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले. त्यात सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ रोपवे प्रकल्पासाठी ४,०८१ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून ९ तासांचा प्रवास फक्त ३६ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
कोणते बदल होतील?
केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करणारे भाविकांकडे ऑनलाइन बुकिंगचा पर्याय आहे. केदारनाथला जाण्यासाठी तीन केंद्रांवरून हेलिकॉप्टर बुकिंग केलं जातं.






