
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू
इम्फाळ : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील लिटान सराइखोंग नागा गावात ८ आणि ९ फेब्रुवारीच्या रात्री जमावाने २० हून अधिक घरे जाळली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सरकारने १० फेब्रुवारी रोजी उखरुल आणि कांगपोकपी जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा निलंबित केली. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर लष्कर पहारा देत आहे. असे असताना या चार महिन्यात 48 जणांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२०२३ पासून सुरू असलेला मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचार जेमतेम कमी होत असतानाच, गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या नागा आणि कुकी संघर्षाने आता हिंसाचाराची तिसरी आघाडी उघडली आहे. याची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी एका किरकोळ वादातून झाली, जेव्हा सराइखोंग गावातील शाळेतून घरी परतणाऱ्या एका नागा शिक्षकाने काही मुलांना रस्त्यावर बसून दारू पिताना पाहिले. शिक्षकाने त्यांना शाळेजवळ दारू पिण्यास मनाई केली. हे मुलगे कुकी समाजाचे होते असा आरोप आहे. त्यांनी शिक्षकालाच मारहाण केली आणि जर त्यांना जगायचे असेल तर उखरुल सोडून जाण्याची धमकी दिली. तेव्हापासून, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर पुन्हा पेटले आहे.
फेब्रुवारी ते जून या काळात ४८ जणांचे अपहरण झाले, २० जणांची हत्या झाली आणि ५० हून अधिक घरे जाळण्यात आली. १९९२ मध्येही अशीच भीती होती, जेव्हा पाच वर्षांच्या संघर्षात एक हजार लोक मारले गेले होते.
अपहरणाच्या २७ व्या दिवशी मृतदेह सापडला
१० जून रोजी खराम वायफेई गावाजवळ सहा नागा पुरुषांचे छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्याने कुकी नागा समुदायांमधील तणाव वाढला. दिलीप थियुमाई यांच्यासह या पुरुषांचे १३ मे रोजी कांगपोकपी येथून अपहरण करण्यात आले होते. दिलीप आणि त्याची पत्नी मुलासाठी औषध आणायला कांगपोकपी बाजारात गेले होते. परत येत असताना, कुकींच्या एका गटाने गाडी थांबवली. त्यांनी सर्वांना बाहेर खेचले, त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना वेगवेगळ्या गाड्यांमधून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी, त्यांनी सर्व महिलांना सोडले, पण पुरुषांना नाही.