
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा मुलगा अंशुल अविजित (Anshul Avijit) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या कोट्यातील सर्व नऊ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले.
काँग्रेसने अजय निषाद यांना मुजफ्फरपूरमधून उमेदवारी दिली आहे. येथील विद्यमान खासदार निषाद यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचा मुलगा आकाश प्रसाद सिंह यांना महाराजगंज मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. आकाशने मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रीय लोक समता पक्षाच्या तिकिटावर पूर्व चंपारणमधून तत्कालीन केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्या विरोधात लढवली होती. ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
बिहार सरकारचे मंत्री आणि जनता दल (युनायटेड) नेते महेश्वर हजारी यांचा मुलगा सनी हजारी यांना काँग्रेसने समस्तीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मदन मोहन तिवारी यांना पश्चिम चंपारणमधन तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने कटिहारमधून माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, किशनगंजचे विद्यमान खासदार मोहम्मद जावेद आणि भागलपूरमधून काँग्रेसचे माजी विधिमंडळ पक्षनेते अजित शर्मा यांना तिकीट दिले आहे.
लडाखच्या खासदाराचे तिकीट कापले
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची 14 वी यादी जारी केली आहे. या नवीन यादीत लडाखच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापून ताशी ग्याल्सन यांना उमेदवारी दिली आहे. नामग्याल भाजपाच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.