
विद्यार्थी आंदोलनादरम्याच केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; 'या' बड्या व्यक्तीला थेट पदावरूनच हटवले
नवी दिल्ली : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा केल्यानंतर गुरुवारी उशिरा शिक्षण मंत्रालयात दोन नव्या सचिवांची नियुक्ती करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांची पंचायतराज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवपदी टी. के. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने प्रधान यांच्याऐवजी उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली केल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले.
पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु असतानाच पुन्हा दोन पेपर लीक; परीक्षाच करावी लागली रद्द
विनीत जोशी हे १९९२ च्या मणिपूर-नागालँड कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनातील कुशल, प्रामाणिक आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) चे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात या दोन्ही संस्थांमध्ये कोणताही मोठा वाद निर्माण झाला नव्हता. त्यामुळे त्यांची अचानक बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र
विरोधकांकडून तसेच विद्यार्थी संघटनांकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना सरकारने विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
IAS गंगवार यांची नियुक्ती
उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी राजस्थान कॅडरचे १९९४ बॅचचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये दोन पेपर लीक
दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटीविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. या पेपरफुटीच्या निषेधार्थ असंख्य तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच उत्तराखंडमध्ये आणखी एका पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटल्याचा आरोप आहे. यानंतर, विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.