घेवडा पिकाचा समावेश प्रधानमंत्री पीक विम्यात करण्याची मागणी (फोटो -सोशल मिडिया)
सातारा जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर घेवडा पिकाची लागवड केली जाते. जवळपास १८ हजार शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन कोरेगाव तालुक्यात घेतले जाते. अलीकडच्या काळात खरीप तसेच रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेवडा पिकाची लागवड होत असून, हे तालुक्यातील प्रमुख पीक बनले आहे.
इतर पिकांप्रमाणे घेवडा पिकाचाही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश व्हावा, यासाठी सन २००३ मध्ये राज्याच्या तत्कालीन महसूल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्राद्वारे कृषी विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतरही अनेक वेळा स्थानिक राजकीय नेते तसेच कृषी विभागाकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप या मागणीला यश आलेले नाही.
सध्या कोरेगाव तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने पाणीसाठा असलेले अनेक तलाव रिकामे आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने घेवडा पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. घेवडा पिकाचा पीक विम्यात समावेश नसल्याने नुकसान झाल्यास उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करून घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अमित भोईटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरेगावचा प्रसिद्ध घेवडा संकटात
राजधानी दिल्लीच्या बाजारपेठेत मागणी असणारा कोरेगाव तालुक्यातील घेवडा शासनाच्या गलथान भूमिकेमुळे गेली अनेक वर्ष पीक विम्यापासून वंचित असल्याने या भागातील शेतकरी शासनाच्या कारभराबाबत उदासीन आहे. सातारा जिल्ह्या्त रब्बी हंगामात सर्वाधिक शेतकरी घेवडा पीक घेतात विशेष करून जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक घेवडा उत्पादन घेतले जाते अस असतानाही घेवडा पीक विम्या बाबत असलेल्या चुकीच्या निकषामुळे वंचित आहे याचा सर्वाधिक मोठा फटका या शेतकऱ्यांना सहन करावा लागतं आहे.






