
World Emoji Day (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
17 जुलै रोजी जगभरात जागतिक इमोजी दिन साजरा केला जातो.
इमोजी आपला खऱ्या भावना लपवते…
इमोजीमुळे नात्यात अंतर वाढण्याची शक्यता…
गैरसमज निर्माण होण्याची शक्यता…
आज मोबाईलशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकांशी चॅटिंग सुरू असते. या गप्पांमध्ये आता शब्दांपेक्षा इमोजींचाच जास्त वापर दिसून येतो. आनंद व्यक्त करायचा असो, राग दाखवायचा असो किंवा एखाद्याचे आभार मानायचे असोत, प्रत्येक गोष्टीसाठी एक इमोजी तयार आहे. त्यामुळे संवाद अधिक रंगतदार झाला असला, तरी या सवयीची एक वेगळी बाजूही आता समोर येत आहे.
17 जुलै रोजी जगभरात जागतिक इमोजी दिन (World Emoji Day 2026 ) साजरा केला जातो. यानिमित्ताने इमोजींच्या वापराबरोबरच त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम समजून घेणे गरजेचे ठरते. कारण अनेकदा सततच्या डिजिटल संवादामुळे नकळत मानसिक ताण वाढू शकतो. पूर्वी लोक प्रत्यक्ष भेटून बोलत होते. चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील बदल आणि देहबोलीतून भावना सहज समजत होत्या. पण आता बहुतेक संवाद मोबाईलच्या स्क्रीनवर होतो. त्यामुळे अनेकजण भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींवर अवलंबून राहतात. विशेषतः तरुण पिढीला चॅटमध्ये इमोजी नसतील तर संदेश कोरडा किंवा रागावल्यासारखा वाटू शकतो.
World Emoji Day : हार्ट पाठवलं आणि थेट तुरुंगात? ‘या’ देशांनी इमोजींवर …
इमोजी आपला खऱ्या भावना लपवते….
मात्र, प्रत्येक व्यक्ती एकाच इमोजीकडे एकाच नजरेने पाहत नाही. एखाद्यासाठी साधा स्माईल आनंदाचे प्रतीक असू शकतो, तर दुसऱ्याला तो केवळ औपचारिक प्रतिसाद वाटू शकतो. अशा छोट्या फरकांमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही वेळा समोरची व्यक्ती नेमकं काय म्हणू इच्छिते, याचा अंदाज बांधण्यातच वेळ जातो. आज अनेकजण स्वतःचे खरे भाव लपवण्यासाठीही इमोजींचा आधार घेतात. मनात चिंता किंवा दुःख असतानाही हसणारा चेहरा पाठवला जातो. त्यामुळे समोरच्याला खरी परिस्थिती समजत नाही. अशा सवयीमुळे मनातील भावना दडपल्या जातात आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.
इमोजीमुळे नात्यात अंतर वाढण्याची शक्यता…
याशिवाय, काही लोक प्रत्येक संदेशाला फक्त एकच इमोजी किंवा छोटासा प्रतिसाद देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. संवाद कमी होत गेला की नात्यांमध्येही अंतर वाढण्याची शक्यता असते. इमोजींचा वापर चुकीचा नाही. उलट योग्य ठिकाणी वापरलेले इमोजी संभाषण अधिक सहज आणि आनंददायी बनवतात. पण प्रत्येक गोष्ट फक्त इमोजीतून सांगण्याचा प्रयत्न केला, तर अनेक भावना अपूर्ण राहतात. काही प्रसंगी स्पष्ट शब्द अधिक प्रभावी ठरतात. विशेषतः महत्त्वाच्या विषयांवर बोलताना आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणे गरजेचे असते.
World Emoji Day: शब्दांशिवाय बोलणारे ‘ते’ चिमुकले चेहरे! ‘जपान ते …
गैरसमज निर्माण होण्याची शक्यता…
डिजिटल संवाद जितका महत्त्वाचा आहे, तितकाच प्रत्यक्ष संवादही आवश्यक आहे. कुटुंबीय, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी वेळ काढून समोरासमोर बोलल्यास नाती अधिक घट्ट होतात. अशा संवादातून भावना स्पष्टपणे व्यक्त होतात आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता कमी होते. तंत्रज्ञानाने आपले आयुष्य निश्चितच सोपे केले आहे. इमोजींनी संवादात रंग भरले आहेत. मात्र त्यांचा वापर मर्यादित आणि समजून करूनच करणे अधिक योग्य ठरेल. कारण प्रत्येक भावनेसाठी एक इमोजी असला, तरी मनातील प्रत्येक भावना शब्दांत आणि प्रत्यक्ष संवादातूनच अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येते.