
मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती
मान्सून हंगाम जवळ येत असताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरातील ४६ हजारांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा उपाय सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असला, तरी पर्यावरण कार्यकर्त्यांनी यामुळे शहरातील वाढत्या उष्णतेची आणि ढासळणाऱ्या वायू गुणवत्तेची समस्या अधिक तीव्र होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. पालिकेच्या माहितीनुसार, एकूण ४६,३३६ झाडांची छाटणी करण्यासाठी ओळख पटविण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १२,५६१ झाडांची छाटणी पूर्ण झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)
कोरडी झाडे हटविण्यात आली आहेत,तर उर्वरित धोकादायक झाडे महिना अखेर हटविण्यात येणार आहेत. ३३,७७५ झाडावरील काम ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याशिवाय ३२५ कोरडी किंवा धोकादायक झाडे ओळखण्यात आली असून त्यापैकी २७९ झाडे हटविण्यात आली आहेत, तर उर्वरित ४६ झाडे महिनाअखेरपर्यंत हटविण्यात येणार आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, झाडांच्या फांद्या वर्षभर वाढत राहतात आणि मान्सूनदरम्यान जोरदार वाऱ्यांमुळे किंवा वादळांमुळे झाडे कोसळण्याचा धोका निर्माण होतो. मागील काही वर्षांत अशा दुर्घटनांत जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२४ मध्ये विक्रोळी येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये मालाड, गोरेगाव आणि भायखळा येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे छाटणीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहेत.
Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट
पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या छाटणीला ‘अवैज्ञानिक’ ठरवले आहे. त्यांच्या मते, यामुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होतील आणि झाडांची सावली कमी झाल्याने स्थानिक तापमानात वाढ होईल.वनशक्ती संस्थेचे संचालक स्टालिन डी यांनी सांगितले की, फांद्यांची अतोनात छाटणी केल्यास रस्ते आणि जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडेल, ज्यामुळे उष्णतेत वाढ होऊन पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो.