
वाई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन यंदा अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करण्यात आला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या उक्तीनुसार, आगाराच्या मोकळ्या जागेत १०० वेगवेगळ्या जातींच्या वृक्षांची लागवड करून आगाराने निसर्ग संवर्धनाचा नवा पायंडा पाडला आहे.
या वृक्षारोपण मोहिमेत केवळ शोभेची झाडेच नव्हे, तर पर्यावरण समतोल राखणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब, सोनचाफा, बकुळ, कांचन, सीताफळ, जांभूळ, फणस, आंबा, बकुळ आणि अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या विविधतेमुळे येत्या काही वर्षांत वाई एसटी आगार एक लहानसे ‘वनराई उद्यान’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या विशेष कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल दौलत भोसले आणि वनरक्षक हर्षदा हांडे यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. वाईच्या आगार व्यवस्थापिका श्रीमती रेश्मा गाडेकर यांच्या पुढाकाराने आणि स्थानक प्रमुख निलेश माने, तसेच लेखाकार यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी बोपर्डी गावचे सरपंच शंकर शिवराम गाढवे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना आगार व्यवस्थापिका रेश्मा गाडेकर म्हणाल्या की, “७८ वर्षे पूर्ण करणाऱ्या एसटी महामंडळाचा प्रवास आता समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी वाढवणारा आहे. १०० प्रकारची झाडे लावून आम्ही केवळ परिसर सुशोभित करत नाही, तर भविष्यातील पिढीसाठी ऑक्सिजनची बँक तयार करत आहोत.”
या मोहिमेत वाई आगारातील एसटी चालक, वाहक, कार्यशाळेतील कुशल तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी फक्त झाडे लावली नाहीत, तर त्यातील प्रत्येकाने एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी (दत्तक) स्वतःहून स्वीकारली आहे. पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाने प्रवाशांचेही लक्ष वेधून घेतले. एकंदरीतच, वाई एसटी आगाराने ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून घेतलेला हा ‘हरित उपक्रम’ संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.