
Raju Shetti, Konkan Farmers, Mango Cashew Growers, Varsha Bungalow, Farmer Protest
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळ माने, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या जिल्हाभरातील आंबा काजू शेतकरी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती;
शेट्टी म्हणाले, आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीबाबत सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर फक्त थोडीफार जुजबी चर्चा झाली. पण आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. ‘राजा उदार झाला आणि हातात भोपळा दिला’ अशी अवस्था आंबा काजू शेतकऱ्यांची झाली आहे. आंबा शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २२ हजार रुपये शासनाने जाहीर केले. म्हणजे एका कलमाला २२० रुपये मिळतात. तर काजू शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावरच सोडले असून ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असेही शेट्टी म्हणाले.
शेट्टी म्हणाले, वास्तविक कोकणातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच काहीतरी मागत आहे. सरकारने त्यांना मुक्त हस्ते मदत द्यायला हवी होती. सरकारने सध्या जे निकष लावलेत त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळून ७० ते ७५ कोटी एवढीच मदत मिळणार आहे. वास्तविक नाशिक कुंभमेळ्यासाठी १५ हजार कोटींवरून ३५ हजार कोटींची तरतूद केली जाते. पण शेतकऱ्यांसाठी केवळ ७० ते ७५ कोटी रुपये दिले जातात, ही बाब अत्यंत संताप जनक आहे. आंबा, काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचेही शेट्टी म्हणाले.
आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याच कारणास्तव दि. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मुंबईस्थित कोकणी बांधव तसेच कोकणातील पाचही जिल्ह्यांमधील आंबा, काजू शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहोत. आंबा, काजू उत्पादकांना न्याय न मिळाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. सदरचा मोर्चा दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटी येथून सुरू होणार आहे. यापुढे शेतकरी गप्प बसणार नाहीत. तर या मोर्चाला अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.