माथेरानसारखीच 'मिनी ट्रेन' धावणार आता पाटण तालुक्यात; पर्यटनाला मिळणार चालना
सातारा : राज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटन संवर्धनाच्या दृष्टीने ७० कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका महिन्यात काम सुरू होईल. पाटण तालुक्यात माथेरानच्या धर्तीवर मिनी ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे मंत्रालयाशी बोलून या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे इत्यादी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात पापर्डे, हेळवाक, मेंढघर, येराड, कोयनारासाटी, कुसवडे कारवट येथे ७० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प राबवत आहे. यामध्ये गॅलरी स्पोर्ट्स, मीटिंग रूम, रेस्टॉरंट, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी याशिवाय तेथील पायाभूत सुविधा इत्यादी कामांना सुरुवात होणार आहे. या कामांच्या निविदा एक महिन्यात काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
हेदेखील वाचा : कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार गाड्या लवकरच होणार दाखल
दरम्यान, या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कामांची ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कडवट टीका केली होती. या टीकेच्या संदर्भात बोलताना देसाई म्हणाले, पडळकर यांचे विधान शंभर टक्के चूक आहे. व्यक्तिगत पातळी पातळीवर कोणी कोणावर जास्त टीका करू नये, असे ते म्हणाले.
गद्दारीचा आरोप करणारे राऊतच खरे गद्दार
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेच्या संदर्भात बोलताना मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत पहिले गद्दार आहेत. पदासाठी उद्धव ठाकरे यांना आघाडी करायला लावली. महायुतीतून निवडून आले आणि महाविकास आघाडीचा घाट घातला. आमच्यावर गद्दारीचा आरोप करणारे राऊतच खरे गद्दार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर देसाई म्हणाले, राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. विनाकारण आरक्षण प्रक्रियेच्या निमित्ताने कोणत्याही मुद्द्याला जातीय वळण देऊ नका. सर्वसामान्यांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.