
अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता
यंदाच्या खरीप हंगामावर ‘अल निनो’ च्या प्रभावाचे सावट असून राज्यात पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाचे प्रमाण कमी राहणे किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पिकांच्या उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले.(फोटो सौजन्य – istock)
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार, मान्सूनला विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणीचा कालावधी लक्षात घेऊन पीक निवडीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरणी करायची असल्यास बाजरी, राळा, राजगिरा, तूर, हुलगा, सूर्यफूल, मटकी आणि सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावे, असे कृषी विभागाने सुचविले आहे. मात्र, या कालावधीत पेरणी करताना मूग आणि उडीद या पिकांची पेरणी टाळावी, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांकडे शेतक-यांनी वळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागल्यास सूर्यफूल, हुलगा, एरंडी आणि बाजरी या पिकांची निवड करावी, तर ऑगस्टमध्ये पेरणी करताना मूग, उडीद आणि सोयाबीनची लागवड टाळण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
८८ शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक हवामान अंदाज, कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या शिफारशींनुसारच पीक नियोजन करावे. संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी माहिती शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.