एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे (फोटो- टीम नवराष्ट्र)
आज एसटी कृती समिती आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये ६ हजारांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६,५०० रुपयांची वाढ केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मंत्री उदय सामंत आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच या बैठकीला कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते तसेच एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील उपस्थित होत्या. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर तोडगा काढणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने तब्बल ६,५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ”मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनुसार राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे अशी आमची मागणी होती. सरकारने त्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीने साडेपाच हजारांची वाढ करावी अशी मागणी केली होती. मात्र आता सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना २०२१ मध्ये अडीच, चार आणि पाच हजार वाढ मिळाली होती, त्या कर्मचाऱ्यांना सरसकट ६,५०० रुपयांची वाढ देण्यात आली आहे. गेले दोन दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. तसेच राज्यात इतर ठिकाणी देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र अखेर बैठकीत तोडगा निघाला आणि प्रवाशानी सुटकेचा निश्वास सोडला.