Ajit Pawar NCP Party Crises : शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. मेहबूब शेख म्हणाले की, येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत. मेहबूब शेख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करीत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अनेक आमदारांसह डायरेक्ट भाजपमध्ये जाणार
सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या पक्षाचे बरेच आमदार 4 जून नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. अनेकांचे निरोप आमच्याकडे येत आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. 4 जूननंतर सुनील तटकरे हे काही आमदारांसोबत डायरेक्ट भाजपमध्ये जाणार आहेत. कारण त्यांना शरद पवार यांच्याकडे एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे ते सर्व गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे.
गोंधळ निर्माण करणारी विधानं
आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा पक्षातील आमदार शरद पवार यांच्याकडे जाऊ नये म्हणून त्यांना ते भाजपमध्ये न्यायचे आहेत. त्यामुळे गोंधळ निर्माण करणारी विधानं ते करीत आहेत. पक्षाला सावरण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या बैठकीतही ते दिसून आलं. गरवारे क्लबमधील त्यांची भाषणं बघितली तर अजित पवार यांचा गट पूर्ण पराभूत मानसिकतेत गेल्याचं दिसते. अजित पवार यांची नैया बुडायला लागली म्हणून तटकरे आता भाजपकडे जाणार आहेत. असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे.
भाजपमध्ये जाणार हे 100 टक्के
सुनील तटकरे हे 100 टक्के भाजपामध्ये जाणार आहेत. 4 जून नंतर बैलपोळा सारखेच त्यांचे सगळे आमदार बाहेर निघणार आहेत. कोणाचं ऐकणार हे त्यांना कळलं आहे म्हणून ते काहीही स्टेटमेंट देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तटकरे साहेबांनी आपल्या पक्षात भुजबळ काय बोलत आहेत किंवा इतर लोक काय बोलतात यावर लक्ष ठेवावं. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मतदारसंघात 100 ते 150 कोटी खर्च करून देखील त्यांना काही यश मिळत नाही म्हणून काही लोकांना घेऊन ते जर भाजपात जाणार आहेत.