
अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
अकोला : अकोला जिल्ह्यात सातपैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात २४ घरांची पडझड झाली, तर महानगरात पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडून काही विद्युत खांबही कोसळले. अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जुलैभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडीबाजार परिसरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी शेती खरडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तातडीने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी पूरग्रस्त भागातून होत आहे.
अकोट तालुक्यात पिकांचे नुकसान
अकोट तालुक्यातील वरूळ, जऊळका, लोतखेड, दिनोडा, सावरगाव, विटाळी आणि खापरवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. सावरगावजवळून वाहणाऱ्या पठार नाल्याकाठची कपाशी आणि तुरीची पिके पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणची सुपीक जमीन खरडून गेली आहे.
मोहाळी नदीला पूर, जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे पळसोद गावालगत वाहणाऱ्या मोहाळी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी दुतर्फा काठ ओलांडून थेट परिसरातील शेतांमध्ये शिरले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. पूर्णपणे शेतांमध्ये पुराचे पाणी साचल्याने नव्याने लावलेल्या कापूस पिकाच्या सऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. सततच्या संततधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून मातीचा चिखल झाला आहे.
ढगा गावात भिंत कोसळली
अकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका अकोट तालुक्यातील ढगा येथील रहिवासी कैलास इंगळे यांच्या कुटुंबाला बसला आहे. त्यांच्या कच्च्या घराची भिंत मातीने ओल धरल्याने कमकुवत झाली होती. सर्वजण झोपेत असताना ही भिंत अचानक कोसळली. त्यावेळी सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य दुसऱ्या खोलीत निद्रिस्त असल्याने अनर्थ टळला.
एल निनोचा अंदाज चुकला ! भारतीय मान्सूनने हवामानशास्त्रालाच दिले आव्हान, AI मॉडेल्सवरही प्रश्नचिन्ह