
धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता
मुंबई : राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिल्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही अधिक आहे. २०२५ आणि २०२४ मध्ये अनुक्रमे १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरविलेल्या एकूण महिल्यांपैकी २०२४ ला ३० हजार ८७७ आणि २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत.
विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात विशेषत; मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर शहरातील अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वरील माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लेखी उत्तर दिले आहे.
हेदेखील वाचा : Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात
दरम्यान, बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत. तर यंदाच्या वर्षात १४ ऑपरेशन मुस्कान सुरु असल्याचे यावेळी लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुले-मुली सापडण्याचे प्रमाण ९६ टक्के
या लेखी उत्तरानुसार, राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर आणि छत्रपती संभाजी नगर या पाच जिल्ह्यात २०१४- २०२५ रोजी एकूण ४ हजार ९८९ बालके हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ८१३ बालके मिळून आल्याची माहिती या उत्तराच्या निमित्ताने देण्यात आली आहे. या दोन वर्षात १४ ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुला-मुलींपैकी ९६ टक्के पेक्षा जास्त मुले व मुली मिळून आल्या असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.