गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न (फोटो सौजन्य-X)
मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दरम्यान गणपती विशेष जादा बस चालवण्यासाठी राज्यातील इतर विभागातून बस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथील विभागात पाठवण्यात येतात. त्यानंतर या बसचे गट आरक्षण झाल्यानंतर, त्या परतीचा प्रवास करताना रिकाम्या येत होत्या. त्यामुळे महामंडळाचा इंधनावर जादा खर्च होत होता. यातून मार्ग काढण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी ३० टक्के जादा भाडेवाढ केली होती. मात्र या निर्णयाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला.