
आशांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत स्तरावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना जाहीर केलेला प्रोत्साहनपर मोबदला अद्यापही पूर्णपणे मिळालेला नाही. जिल्ह्यातील २३७८ पैकी ६७९ आशा अजूनही मानधनापासून वंचित आहेत. मात्र, आता काही आशांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या होत्या. या काळात गावोगावी जनजागृती, स्वच्छता मोहिमा, घरभेटी, लसीकरण मोहिमेस मदत, संशयित रुग्णांचा मागोवा आदी महत्त्वाची जबाबदारी आशा स्वयंसेविकांनी पार पाडली. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नियमित मानधनाव्यतिरिक्त प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अनेक तालुक्यात ही रक्कम अद्याप वितरित झालेली नाही. तर काही तालुक्यांत मात्र सर्व आशांना रक्कम वितरित झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हे काम आशा स्वयंसेविकांनी पार पाडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर हे सर्व कामांचा भाग असला, तरी कर्मचाऱ्यांनी या प्रोत्साहन भत्त्यासाठी आयटक संघटनेने अनेकदा आंदोलने, मोर्चाच्या माध्यमातून शासनाला कळविले. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी आयटक संघटनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मानधनापासून वंचित राहिलेल्या सर्व आशांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
कोरोना काळात दिली ग्रामीण भागात सेवा
२०२०-२१ या काळात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी करण्यावर भर दिला होता. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका-मदतनीस, तसेच आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती, स्वच्छता मोहिमा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी घरभेटी, सर्वेक्षण आणि विलगीकरणाबाबत सूचना देण्याचे कामही करण्यात आले.
हेदेखील वाचा : Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम