
फोटो सौजन्य AI
Satara News : साईबाबा मंदिर ते जकातनाका परिसरातील रस्त्यालगतचे अडथळे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान गोडोली चौकातील जुना जकात नाका हटविण्यात आला. तसेच कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुने झाडही तातडीने हटविण्यात आल्याने संभाव्य धोका टळला.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा ठरणारे लोखंडी बोर्ड व फलक हटविण्यात आले. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे १४ ते १५ बोर्ड हटविण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने पालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या किरकोळ फलक हटविण्याची प्रक्रिया सुरू असली तरी मोठ्या अतिक्रमणांवर पालिका कधी हातोडा चालविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मोहीम सातत्याने राबवून शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी होत आहे.