नागपूर – बल्लारशा रेल्वे स्थानकावरील (Balharshah Railway Station) पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी (Pedestrian Bridge Accidents) रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क (IOW) जी. जी. राजुरकर आणि याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव या दोघांना निलंबित (Suspended) केले आहे. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) झाले होते. मात्र, ते योग्य पद्धतीने केले गेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप आता होत आहे.
ऑडिटमध्ये याबाबत कुठलीच नोंद नाही. या संपूर्ण प्रकरणात दोन अधिकारी दोषी दिसून आल्याने त्यांच्यावर रेल्वे विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा पादचारी पूलाचा प्रि-कास्ट स्लॅब निखळल्याने झालेल्या दुर्घटनेत निलीमा रंगारी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत, मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च, पतीला रेल्वे विभागात कंत्राटी नोकरी देण्याचे लिखित पत्र रेल्वे विभागाने दिले आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रूपये, तर ९ गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख आणि ५ सामान्य जखमींना प्रत्येकी ५० हजार, असे एकूण १६ लाख ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. पादचारी पूलाचे दुरूस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.