"...तरी निवडणुकीचे तिकिट मिळत नव्हते", प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'
Prakash Mahajan Resign News Marathi : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांना दिलेले आवाहन प्रकाश महाजन यांना भोवल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ‘माझा केवळ निवडणुकीत वापर केला,’ अशी खंत प्रकाश महाजन यांनी बोलावून दाखवली. तसेच पक्षाकडून कमी अपेक्षा ठेवूनही वाट्याला उपेक्षाच आल्याने पक्षाचा राजीनामा देत असल्याचे महाजन यांनी समाजमाध्यावर जाहिर केले.
मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिला असा नाही, आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरं तर, मी गंगेला बोल लावल त्याचवेळी थांबायसा पाहिजे होतं. खरं तर, मी पहेलगामच्या वेळी थांबायला पाहिजे होतं.पण त्यावेळी मला वाटले की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल. वैयक्तिक म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, असं प्रकाश महाजन म्हणाले.
माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले.जे माझ्याकडून झालेच नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. त्यांना मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत शब्द दिला होता. असता, अमितजी, मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी, तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतयं. कधीकधी एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचं ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांच्या मीडियावरील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा रंगली होती. या संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी यांनी एका वृत्तसंस्थेसोबत चर्चा साधली. यावेळी प्रकाश महाजनांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले होते.