
मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या असून आता विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. भाजपसह त्यांचे मित्रपक्ष देखील विधानसभेच्या निवडणुकीची मोट बांधण्यास निघाले आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय आठवले गट) यांनी देखील तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावर्षी अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचबरोबर भाजपवर केल्या जाणाऱ्या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अल्पसंख्याकांमधील नाराजी दूर करू
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “अलीकडेच आमची उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी आठ ते दहा जागा मिळायला हव्यात. इंडिया आघाडीवाल्या लोकांच्या अपप्रचारामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असली तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्याची कसर भरून काढू. इंडिया आघाडीने देशात आणि राज्यात संविधानाबाबत अफवा पसरवली ज्यामुळे आम्हाला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. दलित आणि अल्पसंख्याकांमधील नाराजी दूर करू आणि त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू,” असा विश्वास देखील यांनी व्यक्त केला.
मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाहीत का?
भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाही, असा आरोप केला जातो यावर काय सांगाल? असा प्रश्न माध्यमांनी केला. यावर रामदास आठवले म्हणाले, “लोकसभेला भाजपाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला १५ जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला चार जागा दिल्या होत्या. आमच्या पक्षाला त्यावेळी एकही जागा मिळाली नाही. कारण मी एका मतदारसंघात अडकून राहिलो तर राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला मला वेळ देता आला नसता. त्यामुळे आम्ही वेगळे निर्णय घेतले. मी प्रचारात उतरलो, आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आणि आम्ही १७ जागा निवडून आणल्या. या 17 जागा निवडून आणण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.