
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा: गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर वारंवार हल्ले करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. गावालगत लावलेल्या अमिष पिंजऱ्यात हा बिबट्या बुधवारी सकाळी अडकला. या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या छायेत असलेल्या ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बुलढाणा वनपरिक्षेत्रातील गिरडा गाव अजिंठा पर्वतरांगेच्या परिसरात असून गावालगत दाट जंगल आहे. या भागात बिबट्या, अस्वल, तडस यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. काही दिवसांपूर्वी एका बिबट्याने गावातील दोन गोठ्यांमध्ये घुसून नऊ शेळ्या आणि एका वासरावर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवला होता. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने गावाजवळ अमिष पिंजरा लावला होता. बुधवारी सकाळी या पिंजऱ्यात एक मादी बिबट अडकली. मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांनी यापूर्वी गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि ग्रामस्थांशी संवाद साधला होता.
ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत वनपाल प्रफुल्ल मोरे, रेस्क्यू पथकातील संदीप मडावी, अमोल चव्हाण, पवन वाघ, स्वप्निल वानखेडे, वनरक्षक विक्रम राऊत, अमोल हिवाळे तसेच गावातील सरपंच पुत्र अजय गायकवाड, उपसरपंच योगेश गायकवाड, पोलिस पाटील गजानन चांदळकर आणि इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.
बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाने त्याला तपासणीसाठी बुलढाणा येथील राणीबागेत आणले. पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. डी. मेटागळे यांनी वैद्यकीय तपासणी करून बिबट सुदृढ असल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मादी बिबट्याला अंबाबारवा अभयारण्यात सोडण्यासाठी रवाना करण्यात आले. वन विभागाने ग्रामस्थांना जंगल परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन करत वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास त्वरित माहिती देण्याचेही सांगितले.