पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. “विद्यार्थ्यांना न्याय द्या” आणि “शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवा” अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात झळकत होते.
शाहू चौकातील सभेत वक्त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर पावसातही मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्याने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेलाही साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. साताऱ्यात काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू राहिले, तर काही व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.






