
फोटो सौजन्य - Social Media
कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सुमारे 100 वर्षे जुन्या कडुलिंबाच्या झाडाच्या सुकलेल्या अवस्थेमुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. जागृत श्री हनुमान मंदिरालगत असलेले हे ऐतिहासिक झाड नैसर्गिकरीत्या सुकले की जाणीवपूर्वक त्याचे नुकसान करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. झाडाची पाने पूर्णपणे गळून पडली असून फांद्या आणि खोड वाळल्याने ते कधीही कोसळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हे झाड शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात असून परिसरात चहाची टपरी, सलून आणि इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वृक्षतज्ज्ञांकडून झाडाची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. झाड नैसर्गिक कारणांमुळे सुकले की अन्य कोणत्या कारणामुळे त्याचे नुकसान झाले, याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.
गो ग्रीन फाउंडेशनचे सदस्य आशिष बंड यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर आपत्कालीन प्रमुख श्याम सवाई यांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाड हटवून त्याऐवजी इतर ठिकाणी दहा झाडे लावण्याचा पर्याय सुचवला आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, जुनी झाडे नष्ट झाल्यास त्याभोवतीची संपूर्ण जैविक परिसंस्था धोक्यात येते. काही ठिकाणी झाडांना आग लावणे, आम्ल टाकणे किंवा इतर मार्गांनी हळूहळू सुकवून नंतर तोडण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला जात असून, अशा पर्यावरणविघातक कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.