
Chandrapur News: मुसळधार पाऊस कोसळूनही चंद्रपूरातील एकही मोठं धरण ओव्हरफ्लो नाही; १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीलाच अपेक्षित पाऊस न झाल्याने जून महिना बहुतांश कोरडाच गेला. परिणामी धरणे, तलाव आणि जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण होऊ शकला नाही. जूनच्या अखेरीस पावसाने काही प्रमाणात जोर धरला असला, तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा खंड पडल्याने जलसाठा वाढीचा वेग मंदावला. आता जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या प्रारंभी पावसाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.
नदीकाठच्या भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लहान बंधारे आणि साठवण तलाव भरल्याने त्यावरून पाणी वाहू लागले असले, तरी प्रमुख सिंचन प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेपासून दूर आहेत. सिंचन प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता धरणे ‘ओव्हरफ्लो’ होण्याकडे लागले आहे. पाणीसाठा वाढल्यास खरीप हंगामासह आगामी रब्बीसाठीही पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. पिण्याच्या पाण्याची चिंताही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
Amba Ghat Alert: मुसळधार पावसाचा फटका! आंबा घाटातील रस्त्याला भेगा, अवजड वाहनांवर तातडीची बंदी
अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १३ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. मूल, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना आणि बल्लारपूर तालुक्यातील काही मार्गांवर पूल, नाले व रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. सर्वाधिक कोरपना तालुक्यात ४, तर राजुरा तालुक्यात ३ आणि बल्लारपूर तालुक्यात २ रस्ते बंद आहेत. चंद्रपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा आणि जिवती तालुक्यांतील प्रमुख मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे.