देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. अशातच सांगलीमधील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) गाडीला काही अज्ञात व्यक्तीकडून चप्पलांचा हार घालण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच त्यांच्या गाडीवर शाई फेक देखील करण्यात आली. मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा आशयाचे पत्र देखील लिहून ठेवण्यात आले होते. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, प्रकाश शेडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला निंदनीय आहे. हल्ला करून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकवेळा माझ्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. घाबरून निवडणुकीतून माघार घेतली नाही. माझ्यामुळे जर महायुतीतील पक्षांना अडचण होत असेल तर मी बाजूला होतो. पण लवकरच एकत्रितपणे निर्णय घेऊन निवडणुकीच्या कमला लागलं पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.
प्रकाश शेंडगे असतील किंवा कुठल्याही पक्षाचा नेता असेल. कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मते द्यायची, त्याला किती विरोध करायचा. आपण लोकशाहीमध्ये दादागिरीकरून कोणालाही थांबवू शकत नाही. ,म्हणून प्रकाश शेंडगे यांचे संरक्षण करणे पोलिसांचे काम आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रकाश शेंडगे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.